‘कोरोना वॉरियर्स’ करतात पार्थिवावर अंत्यसंस्कार

कोरोना संसर्गाच्या भितीने बऱ्या झालेल्या रुग्णांना एवढंच नाहीतर नर्सेस, डॉक्टर्स यांना वाळीत टाकल्यासारखी वागणूक देणं, राहती जागा सोडायला सांगणं अशा बातम्या गेले काही दिवस सगळ्यांनीच वाचल्या असतील. अगदी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आई-वडिलांचे पार्थिवही स्वीकारण्यास नकार दिल्याच्या घटना घडल्या. हे बघूनच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी बाधितांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार व्हावेत म्हणून लोकांना पुढे यायचं आवाहन केलं.

कविता चव्हाण या धाडसी तरुणीने आपल्या टायगर ग्रुपच्या सहकारी मित्रांसह कोरोनाने मरण पावलेल्या बाधितांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली आहे. कवितासोबत टायगर ग्रुपमधील तानाजी जाधव, श्रीमंत चव्हाण, केतन देवी, मधुकर कुरापाटी, प्रल्हाद कळसकर, सागर राठोड, अवी पवार या साऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका प्रशासनाची यंत्रणा कमी पडत आहे. म्हणून सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मदतीसाठी तरुणांना कोरोना वॉरियर्स बनून पुढे येण्याचे आवाहन केले होते.

 एक सामाजिक जबाबदारी म्हणून कोरोना बाधिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली असल्याचं कविता चव्हाण यांनी सांगितले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी व समन्वयक पांडे यांच्या सूचनेनुसार रुग्णालयातील मृतदेह ताब्यात घेऊन अ‍ॅम्बुलन्समधून अंत्यविधीच्या ठिकाणी नेणे व त्या त्या धर्मानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करत आहेत.

याविषयी उपायुक्त पंकज जावळे म्हणाले की, “महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कविता चव्हाण आणि त्यांच्या टायगर ग्रुपने मृतदेह अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत नेण्याची जबाबदारी उचलली असून हे पथक चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. शहरातील ज्या तरूणांना विविध स्तरावर काम करायचं आहे त्या तरूणांनी पुढे यावे.”
– विनोद चव्हाण, सोलापूर

Leave a Reply