प्राजक्ता साळुंके, मलकापूर, जि सातारा या विद्यार्थिनीने माजी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की, मलकापूरसारखी राज्यभर मुलींसाठी सुरक्षित बससेवा उपलब्ध करून द्यावी. कारण, सुरक्षित रस्ते, बससेवा या अभावी मुलींची शाळा, विशेषत: माध्यमिक वर्गातील मुलींची शाळा मध्येच थांबते. १८ वर्षाखालील मुलींची लग्ने करून दिली जाण्याचे एक कारण त्यांची शाळा खंडित होणे, हे देखील आहे. मुलींसाठी बससेवेचे एक कॉस्ट इफेक्टिव्ह मॉडेल आपल्या राज्यातच गेल्या आठ वर्षांपासून उपलब्ध आहे. या बससेवेमुळे त्या परिसरातील मुलींची शाळागळती शून्यावर आली. कोविडकाळातील टाळेबंदीचा काळ वगळता ही बससेवा सुरू आहे, असं आजच मलकापूर नगरपरिषद जनसंपर्काधिकारी श्री ज्ञानदेव साळुंखे यांनी नवी उमेदला सांगितलं.
मुलींची शाळा सुटू नये यासाठी त्यांना घरापासून शाळेत ने-आण करणारं बससेवेचं हे उत्तम मॉडेल महाराष्ट्रात मलकापूर, कराड, जि सातारा इथे आहे. एसटी महामंडळाच्या बसेस आणि नगरपालिकांचं आर्थिक योगदान, शिवाय बसमध्ये स्त्री कंडक्टर. या त-हेची बससेवा राज्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र उपलब्ध करावी अशी आम्हा सर्वांची २०१६ पासूनची मागणी होती. अशी योजना काल मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. या योजनेला सावित्रीबाई फुलेंचं नाव देणं यथार्थच आहे. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचं द्रष्टेपण, दिशादिग्दर्शन, कार्य आणि त्यांनी केलेला संघर्ष यामुळेच आज मुली शाळेत जाऊ शकतात. महाविकास अघाडीतील प्रमुख पक्ष आहे शिवसेना. २०१९ च्या शिवसेना पक्षाच्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात २ हजार ५०० विद्यार्थी एक्स्प्रेस बसेस सुरू करायचं वचनही दिले होते.
मलकापूरच्या बससेवेची कल्पना कशी आकाराला आली?
दिल्लीमध्ये २०१२ साली ‘निर्भया दुर्घटना’ घडल्यावर सार्वजनिक वाहनाने प्रवास करणा-या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. देशभर दाटलेली अस्वस्थता सातारा जिल्ह्यातील छोटे शहर मलकापूरही अनुभवत होते. अशा घटना घडतात, विस्मरणातही जातात. मुलींचा सुरक्षित प्रवास हा मुद्दा उरतोच. पण मलकापूर नगरपरिषदेने समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला आणि मुलींसाठी सुरक्षित बससेवा सुरू करून आदर्शच घालून दिला.
‘निर्भया दुर्घटने’नंतर मुलींच्या सुरक्षित प्रवासाचा विषय आमसभेत चर्चेला आला, तेव्हा अनिता यादव या नगरसेविकेने मुलींसाठी बससेवेची कल्पना मांडली. मुलींना एकएकटे शाळा-कॉलेजला जावे लागणार नाही आणि मुलींची शाळेतली उपस्थितीही वाढेल असा यामागचा विचार होता. मलकापूर नगरपरिषदेचे अभ्यासू, कल्पक उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून योजनेला आकार दिला. एसटी बसप्रवासासाठी मुलींना पन्नास टक्के सवलत होतीच. उर्वरित पन्नास टक्के नगरपरिषदेने स्वतःच्या महिला-बालकल्याण निधीतून द्यायचे ठरवले. एसटी महामंडळाचे तेव्हाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनीही साथ दिली. दोन बसेस राखून ठेवल्या गेल्या. मेळावे घेऊन लोकांना, विशेषत: महिलांना विश्वासात घेतले आणि पाच वर्षांपूर्वी ८ जुलैला ‘प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियाना’अंतर्गत बससेवेचा शुभारंभ झाला. तेव्हापासून ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
मलकापूर बससेचेचे व्यवस्थापन कसे केले जाते?
सकाळी ६.३० ते संध्याकाळी ७.३० या काळात दर अर्ध्या तासाने ही बस मुलींच्या सेवेला असते. बसमध्ये कंडक्टरही महिलाच असल्याने त्यामुळे शिक्षणासाठीचा प्रवास तणावरहित होतो, असे मुली सांगतात. शाळा-कॉलेजे सुरु व्हायच्या एक महिना आधी नगरपरिषद पुढील शैक्षणिक सत्राच्या प्रवासखर्चाची पूर्ण रक्कम एसटी महामंडळाकडे जमा करते. कुटुंबांची, मुलींची, त्यांच्या शाळा-कॉलेजची माहिती जमा केली जाते. त्यानंतर एसटी पासेस दिले जातात. यासाठी प्रत्येक महिन्याच्या एका पासची किंमत आहे २४० रु. यातले १८० रु. नगरपालिका भरते. तर उर्वरित ६० रु. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून भरले जातात. दिवसेंदिवस लाभार्थी मुलींची संख्या वाढत आहे.
मलकापूर बससेवेचे काय फायदे झाले?
1. मुलींची शाळागळती थांबली.
2. शाळा-कॉलेजपर्यंत जाण्या-येण्यासाठी रोज होणारा ८० रु. खर्च या सेवेमुळे वाचला.
3. पूर्वी कित्येक पालक मुलींना सोडा-आणायला शाळेत जात-येत. पालकांचा तो वेळ आणि खर्च वाचला. मुलींच्या सुरक्षिततेच्या समस्येमुळे पालकांना सहन करावा लागणारा ताण गेला. पालक निश्चिंत झाले.
4. मलकापूर शहर आणि परिसरातील काही महाविद्यालयांना जाण्यासाठी थेट सोय नव्हती. त्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या बसने मुलींना जावं लागायचं. त्यांची सोय या सेवेने झाली.
5. थोड्या-थोड्या अंतरावर बसथांब्याची सोय केल्यामुळे मुलींना घरापासून केवळ पाचच मिनिटांच्या अंतरावर बस मिळू शकते. ही मोठी सोय झाली आहे.
(मलकापूर हे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांच्या मतदारसंघातलं शहर आहे. बालकांच्या समस्यासंदर्भात आम्ही त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी हा बससेवेचा उपक्रम कोणत्याही छोट्या शहराला करता येण्याजोगा असल्याचं आग्रहपूर्वक सांगितले होते.
संपर्कासाठी नंबर: मलकापूर नगरपरिषद जनसंपर्काधिकारी श्री ज्ञानदेव साळुंखे: 9423868200
मलकापूर नगरपरिषद सीइओ: 9423279333)
– वर्षा आठवले
संपादक, नवी उमेद