झारखंडच्या सौरवचा पहिला वाढदिवस झाला तिवस्यात साजरा
घर शेकडो किलोमीटर दूर. त्यात मुलाचा पहिला वाढदिवस. आनंदाचा हा क्षण साजरा करायचा तरी कसा? असा प्रश्न यादव कुटुंबियांच्या मनात उभा राहिला.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू झालेली असताना मूळ झारखंड येथील करण यादव व त्यांचे कुटुंबिय तिवसा येथे अडकून पडले. प्रशासनाने तत्काळ ग्रामीण रूग्णालयात त्यांची आवश्यक तपासणी करून त्यांना निवारा केंद्रात दाखल केले व त्यांच्या निवास, भोजनाची सोय केली. अधिकारी- कर्मचा-यांकडून या सर्वांची वेळोवेळी आस्थेने चौकशी होते. सर्वांचा एकमेकांशी परिचय झाला असून, कुटुंबातील मुलांशीही प्रशासनातील सहकारी संवाद साधत असतात. अशा संवादातूनच तिवसा येथील मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना करण यादव यांचा मुलगा सौरवचा पहिला वाढदिवस असल्याची माहिती मिळाली. निवारा केंद्रातील अधिकारी- कर्मचा-यांनी यादव कुटुंबियांचा हा आनंदाचा क्षण वाया जाऊ दिला नाही.
तहसीलदार वैभव फरताडे यांनी ही कल्पना उचलून धरली व तत्काळ सामग्रीची जुळवाजुळव सुरू झाली. संचारबंदीमुळे हलवायांची दुकाने व उपाहारगृहे बंद आहेत. त्यामुळे स्थानिक हलवायाच्या मदतीने घरातच एक छानसा केक बनविण्यात आला. एकाच्या घरी वाढदिवसासाठीची खास मेणबत्तीही मिळून गेली. ही सगळी तयारी पाहून यादव कुटुंबियही आनंदून गेले. निवारा केंद्राच्या आवारात सुरक्षित अंतर राखत सौरवचे कुटुंबीय, इतर नागरिक, कर्मचारी सगळे जमले. सर्वांनी मिळून सौरवचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व चिमुकल्यांना खाऊही देण्यात आला.
सौरवचे वडील करण यादव म्हणाले की, “सौरवचा पहिलाच वाढदिवस असल्याने तो चांगला साजरा व्हावा, अशी इच्छा होती. प्रशासनाने आवर्जून सगळी तयारी केली. सामग्री आणून आमच्या आनंदात सहभागी होत आमचा हा क्षण अधिक आनंददायी केला. या आगळ्या वेगळ्या क्षणाची आठवण कायम राहील.”
– अमोल देशमुख, अमरावती