मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्राच्या परिसरातून रोज दहा टन कचरा तयार होतो. ह्या कचऱ्यातून रोज दोन टन एवढे खत तयार होते. माथेरान नगरपरिषद रोज ५ टन कचऱ्यापासून बायोगॅस आणि खत तयार करते. असेच उपक्रम पुणे, इचलकरांनी, कराड, चेन्नई, तुतिकोरिन इत्यादी शहरातील नगरपालिका संस्थांशी भागीदारी करून उभारले गेले आहेत व देशभरात अशा प्रकल्पांची एकूण संख्या दोनशे पर्यंत जाते. तसंच कुर्ला, मुंबई इथल्या कामगार नगर येथे ४५४ परिवार रोज त्यांच्या घरातील कचऱ्यापासून जवळजवळ २०० किलो खत बनवतात. आणि अंधेरी, मुंबई इथल्या विजयनगर सोसायटीतील ५१५ परिवार दर महिन्याला जवळजवळ ५००० किलो कचऱ्यापासून ५०० किलो खत तयार करतात. त्यांनी हे खत त्यांच्या इमारतीतील बागांमध्ये वापरायला सुरुवात तर केलीच आहे, पण त्याचबरोबर ते हे खत बाहेर विकतातही!
ह्या यादीतील कामगार नगर, कुर्ला व विजयनगर सोसायटी, अंधेरी येथे प्रत्यक्ष जाऊन तिथले प्रकल्प मी पाहून आलो.
परंतु हे खत कुठे व कसे वापरले जाते हे देखील महत्वाचे आहे. कामगार नगर सोसायटीने ह्या प्रकल्पाच्या आवारात एक सुंदर बाग तयार केली आहे व तिथे विविध प्रकारची झाडं लावली आहेत. त्यांना नियमितपणाने खत मिळत असल्यामुळे तिथली जमीनही सुपीक आहे व ही झाडं अधिक बहरू शकली आहेत. शिवाय अतिरिक्त खत विकता ही येतं. ह्या प्रकल्पाची आणखी एक विशेष बाब म्हणजे नारळाच्या झावळींपासून खत बनवण्याची प्रक्रिया देखील इथे सुरु झाली आहे. कामगार नगर परिसरात अनेक नारळाची झाडं आहेत व ह्या प्रक्रियेसाठी भाभा अणु संशोधन केंद्राची मदत त्यांना मिळाली. ह्या झावळींना देखील shredder च्या मदतीने बारीक केले जाते व पुढील प्रक्रिया स्वयंपाकघरातील कचऱ्यासारखीच आहे.
आता तर तिथे एका Jogging/walking track ही बांधला गेला आहे व सोसायटीतील लोकांना सकाळी उत्तम वातावरण व नैसर्गिक सानिध्य अनुभवायची संधी मिळते. ह्याच बागेत त्यांनी सौरउर्जेवर चालणारे दिवे ही बसवले आहेत. स्वच्छ ऊर्जा आणि शून्य कचरा ही उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे ‘ग्रीन सोसायटी अभिनव प्रकल्प’ अंतर्गत प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले आहे व त्यासाठी त्यांना पाच लाख रुपयांची रक्कम व पारितोषिक देण्यात आले आहे.

असाच अनुभव मला अंधेरी पूर्व, मुंबई इथल्या विजयनगर सोसायटीला भेट दिली तेव्हा आला. तिथल्या ५१५ सदस्यांनी, म्हणजेच २०००+ लोकसंख्या असलेल्या ह्या समूहाने २०१५ पासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबविला आहे. तिथे सुकृता पेठे आणिबापट ह्या प्रकल्पाचे नेतृत्व करीत आहेत व आतापर्यंत अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी ह्याचा प्रचार व प्रसारही केला आहे. कामगार नगर सोसायटीसारखाच इथेही डॉ शरद काळे हाच दुवा आहे. किंबहुना, डॉ काळे आणि स्त्री मुक्ती संघटना ह्यांच्या मदतीने प्रकल्पाची सुरुवात इथे झाली व नंतर इथल्याच सदस्यांनी कामगार नगर सोसायटीला मार्गदर्शन केलं आणि तिकडचा प्रकल्प सुरु झाला. इथे पाच ठिकाणी प्रत्येकी दोन खड्डे तयार केले आहेत व एका खड्ड्यात संपूर्णपणे कचरा भरेपर्यंत साधारण एका महिन्याचा अवधी लागतो. ह्या महिनाभरात तो आधी तयार झालेल्या खतात एकजीव केला जातोच. व नंतर हे पूर्ण मिश्रण आणखी महिन्याभरानंतर संपूर्णपणे खताचे रूप धारण करते. तोवर दुसऱ्या खड्ड्यात तीच प्रक्रिया सुरु राहते. अशाप्रकारे एका महिन्यात साधारण ८००० किलो कचऱ्यापासून ८०० किलोपर्यंत खत तयार होते. हे खत तिथल्या बागेत वापरले जाते व अतिरिक्त खत बाहेर विकलेही जाते. इथले सदस्य शेतकऱ्यांच्या संपर्कातही असतात असं बोलताना लक्षात आलं. इथल्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असे की एनडीटीव्हीच्या ‘बनेगा स्वच्छ इंडिया’ ह्या मालिकेतील चौथ्या सत्रात ह्यांचा समावेश झाला होता. तेव्हा अमिताभ बच्चन ह्यांच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेला हा कार्यक्रम देशभर अनेकांपर्यंत पोचला. तो आपण इथे पाहू शकतो:
https://youtube.com/watch?v=611GXtWCkgo&si=EnSIkaIECMiOmarE
ह्या विषयासंबंधित माहिती घेताना पुण्यातील प्रमोद तांबे आणि अनिता तांबे ह्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांना पुणे महानगरपालिकेचा त्यांच्या ‘मातीविरहित बाग’ ह्या उपक्रमासाठी ‘स्वच्छता पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांच्या घरातील कचऱ्यापासून जे खत तयार होतं त्याचा वापर त्यांनी आपल्या बागेसाठी केला आहे व आज १५० हून अधिक वनस्पति त्यांच्या बागेत बहरत आहेत. हा ‘निसर्गऋण’ पद्धतीशी थेट संलग्न नाही, परंतु एक सकारात्मक उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहता येईल.
तसेच दोन आठवड्यांपूर्वी गोव्यात असताना डॉ काळे ह्यांची संकल्पना केवढा मोठा पल्ला गाठू शकते ह्याचा प्रत्यय आला. तिथे साळीगाव इथला प्रचंड मोठ्या पातळीवरील प्रकल्प शेजारील काही गावांच्या कचऱ्याचे विघटन करीत त्याचे केवळ खतातंच नाही, तर बायोगॅस आणि पुढे ह्या गॅसपासून विजेची निर्मिती देखील यशस्वीरित्या करतो आहे.
ही उदाहरणं पाहिली की लक्षात येतं की ह्या सर्व उत्पादनांचा स्रोत एकच आहे. आपल्या घरातील कचरा! अर्थात, एक महत्वाचे संसाधन! आता त्याला सडवत ठेवणे योग्य की त्याच्यावर प्रक्रिया करून निसर्गाचे ऋण फेडणं योग्य, हे तुम्ही ठरवा!
तुम्ही योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा!
खताची क्रांती, शून्य कचरा आणि हवामान बदल रोखण्याच्या दिशेने
आजच्या ह्या लेखात पुन्हा एका गोष्टीची आठवण करून देतो, ती म्हणजे आपण स्वयंपाकघरातील जैविक विघटनशील अर्थात biodegradable waste बद्दल बोलत आहोत. शहराच्या पातळीवर विचार केल्यास, जर आपण सर्वानी आपल्या स्वयंपाकघरातील कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंडपर्यंतचा प्रवास कायमचा थांबवला तर त्याचा खूप मोठा परिणाम साध्य होऊ शकतो. सर्वप्रथम तर डम्पिंग ग्राउंडवर साठणाऱ्या ह्या कचऱ्याचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर कचऱ्याचे प्रमाण कमी तर आधी उल्लेख केलेल्या परिणामांची तीव्रता देखील कमी होईल. म्हणजेच प्रदूषण, रोग पसरणे व कार्बन/मिथेन उत्सर्जन ह्याचे प्रमाण देखील कमी होईल. शिवाय प्रत्येक घरी सेंद्रिय खत तयार होईल ही गोष्ट वेगळीच! देशात काही पालिका संस्था अशा आहेत ज्यांनी नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करायला प्रशिक्षित केलं आहे. त्यामुळे जैविक विघटनशील कचरा वेगळा करणे हे अनेकांना ठाऊक आहे. त्यामुळे इथे लिहिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केले तर प्रत्येक घर सेंद्रिय खताची निर्मिती करू शकेल. हे खत इमारत परिसरातील बागकाम, घरी कुंडीत वाढणारी रोपं येथे तर वापरले जाऊच शकते. शिवाय ते एकत्रितरित्या महानगरपालिका/नगरपालिकेला विकून शहरातील बागांच्या वाढीसाठीही वापरले जाऊ शकते.

ग्रामीण पातळीवर विचार केला तर हे परिणाम अनेक अंगांनी प्रभावी ठरू शकतील. शेतीवर अवलंबून असलेल्या बहुतांश लोकांना ह्या खताचा उपयोग झाला नाही तरच नवल! काही घरं किंवा गावातील एखाद्या भागातील लोक एकत्र करून आपापल्या शेतासाठी वापरू शकतात. अर्थात, हे वैयक्तिक आणि सामूहिक ह्या दोन्ही पातळीवर लागू होऊ शकतं. आणि स्वतःच्या शेतासाठी वापरून झालेलं अतिरिक्त खत इतर ठिकाणी विकलं जाऊ शकतं. त्यामुळे ह्या प्रकल्पाचे दीर्घकालीन परिणाम एक अतिरिक्त उत्पन्न स्रोत तयार होणे हा देखील आहे. परंतु ह्या व्यतिरिक्त आणखी एक परिणाम तितकाच महत्वाचा आहे. तो असा की ह्या सेंद्रिय खतात कार्बनचे प्रमाण लक्षणीय असते. त्याचबरोबर फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅशियम ह्यांचेही चांगले प्रमाण असते. हे खत जेव्हा आपण शेती, बागकाम इत्यादीसाठी मातीत मिसळतो तेव्हा हे सारे घटकही मातीत मिसळून तिला अधिक सुपीक बनवतात. आणि जेव्हा माती सुपीक होईल तेव्हा शेतकरी वर्गाला खतावर, युरियावर अतिरिक्त खर्च करणं थांबवता येईल. शिवाय पीक जास्त येईल ते वेगळंच! आणि खर्च कमी व पीक जास्त ह्याचाच अर्थ अधिक नफा. विशेषतः छोट्या पातळीवर काम करणारे शेतकरी त्यांचे उत्पन्न नक्कीच वाढवू शकतील.
हे साध्य करण्यासाठी कदाचित गावातील काही घरांना एकत्र येऊन नियोजनबद्ध काम करावे लागेल. प्रत्येक घरात साधारण किती कचरा निर्माण होतो व सर्वांचा मिळून त्याचे प्रमाण किती आहे ह्याचा प्राथमिक अंदाज लक्षात आला की पुढचं नियोजन सोपं होईल. लगेच मोठ्या प्रमाणात खत तयार होईल हा समज बाजूला सारून ही प्रक्रिया शाश्वत होण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल.
‘अमूल’मुळे आपण दुधाची क्रांती झालेली पाहिली. प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातील अतिरिक्त दूध सहकार पातळीवर येऊन विकून त्याचे पैसे कमावतो व हे सर्व दूध नंतर ‘अमूल’च्या कारखान्यात येऊन त्याची विविध उत्पादने तयार होतात असे ह्या क्रांतीचे स्वरूप आहे. अशाचप्रकारे जर गावात सर्वांनी मिळून एक खतनिर्मितीचे केंद्र तयार केले तर त्यावर गावातील शेती सुरळीत राहण्यास मदत तर होईल, पण अतिरिक्त खत विकताही येईल.
शून्य कचरा आणि जागतिक तापमान वाढ थांबवण्यास आपला प्रयत्न:
ह्या उदाहरणांमुळे ‘शून्य कचरा’ ही आदर्शवादी कल्पना न राहता तिला वास्तववादी स्वरूप दिले जाऊ शकते ह्याची खात्री पटते. आपण पाहिलेली महानगरपालिका, संस्था ह्यांची उदाहरण तसेच हौसिंग सोसायटी ह्यांनी सध्या केलेल्या परिणामांमुळे लक्षात येतं की हे नक्कीच शक्य आहे! शिवाय आपल्या ह्या छोट्या प्रयत्नांमुळे आज जगात थैमान घातलेल्या ‘जागतिक तापमान बदल’ अर्थात Global Warming चा प्रश्न सोडवण्यासाठी मदत मिळू शकते. जर आपल्या घरातील जैव विघटनशील कचरा हा डम्पिंग ग्राउंडमध्ये न सडता त्याचे खतात रूपांतर होत असेल किंवा त्याचे बायोगॅसमध्ये रूपांतर होत असेल तर आपल्याकडून वातावरणात कार्बन उत्सर्जन न होण्याचे मोठे कार्य घडेल. नाहीतर हा कार्बन मिथेन व कार्बन-डायऑक्साईडच्या रूपाने वातावरणात पसरेल व जागतिक तापमानात वाढ होण्यास कारणीभूत ठरेल. जगातील सर्व देश हे वातावरणात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपली ही छोटी पावलं हे ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत करतील.

सारांश:
सेंद्रिय खत तयार करायची ही पद्धत अगदी सोपी असली तरीही त्यात काही आव्हानं जरूर आहेत. अगदी मूलभूत आव्हान म्हणजे आपला स्वभाव! ‘हे माझे काम नाही’ असा बहुतेकवेळेस कचरा ह्या विषयासंबंधित आपला सूर असतो. तो बदलणं अतिशय गरजेचं आहे. ‘कचरा’ ह्या शब्दाभोवती नकारात्मकता निर्माण झाल्यामुळेही असे घडते. म्हणूनच डॉ काळे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे कचऱ्याकडे ‘संसाधन’ म्हणून पाहणे महत्वाचे आहे. दुसरे आव्हान म्हणजे ह्या प्रकल्पामुळे घरी दुर्गंधी साठेल व किडे तयार होतील ही भीती. पण ह्यातले काहीही होत नाही. जर अतिशय बारीक केलेला कचरा बादलीतील आधीच्या खताशी व्यवस्थितरित्या एकजीव केला तर प्रक्रियेला वेग धरतो व कोणत्याही प्रकारची दुर्गंधी किंवा किडे तयार होत नाही. शिवाय आपण हे विसरतो की जर आपल्या कचऱ्यात शिजवलेल्या,

तयार पदार्थांचा समावेश नसेल तर दुर्गंधी किंवा किडे होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही!
आणि म्हणूनच, अन्नाची नासाडी टाळा! आपल्याला हवं तेवढंच जेवण बनवा व ते टाकून देऊ नका. जर हे गणित जमलं तर तुमच्या रोजच्या कचऱ्यात केवळ फळांची सालं, भाज्यांची देठं इत्यादी पदार्थांचा समावेश असेल. परिणामी, दुर्गंधी टळेल, किडे तयार होणार नाहीत व खत तयार होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल.
मी महिनाभर ही प्रक्रिया अनुभवतो आहे व त्यामुळे एक वेगळाच आनंद अनुभवतो आहे. आपल्याकडून अन्नाचा नाश होत नाही ह्याचा आनंद व तो करू नये ह्याची नव्याने झालेली जाणीव. शिवाय आपल्याकडून काहीतरी सकारात्मक घडते आहे ह्याचाही आनंद वाटतो आहे. शिवाय निसर्गाशी एकनिष्ठ राहण्याची संधी मिळाली आहे ती वेगळीच! माझ्या घरातून डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा जात नाही व जागतिक तापमानात वाढ होऊ नये म्हणून माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न होतो आहे ह्याचे समाधान आहे.
अर्थात, हे आपण सर्वांनी केलं तर त्याचे परिणाम अधिक वेगाने समोर येतील आणि डॉ काळे ह्यांच्या शब्दात सांगायचे तर, “भारत दोन दिवसात स्वच्छ होऊन जाईल.”
-आशय गुणे