स्मशानभूमी बदलत आहे

 

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड ततालुक्यातील पिंपळगाव बसवंत हे एक मध्यम आकाराचे गाववजा शहर. हे गाव आता सर्वांगाने कात टाकत आहे. गावातल्या १५० भिंतींवर चित्रे आणि पर्यावारणपुरक जनजागृतीपर संदेश. त्यामुळे शहर रंगबिरंगी आणि प्रबोधन करणारे झाले आहे.स्थानिक कलाकार विजय माळी आणि संतोष सोनवणे यांनी ही चित्रे काढली आणि रंगवली आहेत.


स्मशानभूमी तर ओळखू येणार नाही इतपत बदलली आहे. आकर्षक चित्रे, घोषवाक्ये, सुविचार, सुभाषिते यामुळे ही स्मशानभूमी आहे, असे वाटतच नाही. सरपंच अलका बनकर आणि ग्रामपंचायतीने हा बदल घडवला.


पूर्वी इतर स्मशानभूमीप्रमाणेच इथेही अनेक समस्या होत्या. कुठल्याही संवेदनशील माणसाच्या दु:खात भर घालणारी. तीव्रता जाणवल्याशिवाय राहणार नाही असे एकंदर चित्र होते. ग्रामपंचायतीने गावाप्रमाणेच स्मशानभूमीवर लक्ष केंद्रित केले. सर्वप्रथम स्मशानभूमीभोवतालची सर्व झाडे आकर्षक रंगवली. त्यानंतर स्मशानभूमीच्या भिंतींवर महादेवाचे, गौतम बुद्धांचे आणि इतर अनेक चित्र आकर्षकपणे रेखाटली. आकर्षक घोषवाक्य, सुभाषिते जनजागृतीपर बोधवाक्ये ठळक अक्षरात लिहिली, रंगवली. यामुळे इथे येणा-याचे नकळत प्रबोधन होते, त्याला धीर मिळतो. बसण्यासाठी स्टेडीयमसारखी रचना. बसण्यासाठी लोखंडी बेंच.


या सर्व उपक्रमाला आतापर्यंत १८ लाख रुपये खर्च आला असून ग्रामपंचायत निधीतून तो करण्यात आला आहे. पूर्वी एकच अंत्यसंस्कार होई. आज एकाचवेळी तीन अंत्यसंस्कारांची सोय आहे.
स्मशानभूमीत आता एका पूर्णवेळ कार्यकर्ता नेमण्यात आला आहे. तो सर्व प्रक्रिया पार पाडतो. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आता स्मशानातच उपलब्ध झाल्याने कुठल्याही गोष्टीसाठी धावाधाव करण्याची गरज उरलेली नाही.

– भाग्यश्री मुळे, ता. निफाड जि .नाशिक.

Leave a Reply